सदाभाऊचे मंत्रिपद तुला देतो असे मुख्यमंत्र्यांनी कानात सांगितले - जयाजी सूर्यवंशी

मी असे बोललोच नाही : जयाजीरावजे मी बोललोच नाही, ते माझ्या तोंडी टाकणे चुकीचे आहे.मी आधीच खूप भोगले आहे. कृपया मला टार्गेट करणे थांबवा, असे जयाजीराव सुर्यवंशी यांनी सरकारनामा कार्यालयात दूरध्वनीवर सांगितले.
सदाभाऊचे मंत्रिपद तुला देतो असे मुख्यमंत्र्यांनी कानात सांगितले - जयाजी सूर्यवंशी

मुंबई : शेतकरी संपाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संप मिटविण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कानात हळूच सदाभाऊचे मंत्रिपद तुला देतो, असे सांगितले असल्याचा गौप्यस्फोट जयाजी सूर्यवंशी यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत अनौपचारिक गप्पा मारताना केला. 

मात्र आपण माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलतोय ही बाब लगेच लक्षात आल्याने त्यांनी आपल्या या वक्‍तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. आपण केलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे योग्य दिशेने गेले होते, मात्र नंतर ते चुकीच्या दिशेने गेल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकरी संपाच्या दरम्यान विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे विचार न घेताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील शेतकरी संप मागे घेत असल्याचे जाहीर केल्याने जयाजी सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या व विविध संघटनांच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागले होते. 

पुणतांब्यापासून ते सह्याद्रीपर्यंतच्या बैठकीपर्यंत शेतकरी नेते ठरलेले सूर्यवंशी एकाच बैठकीनंतर शेतकऱ्यांचे खलनायक ठरल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्यानंतर त्यांना या संपाच्या आंदोलनातून बाहेर फेकले गेले होते. याच पार्श्‍वभूमीवर नंतर शेतकरी संप मिटला असला तरी जयाजी सूर्यवंशीने आपले शेतकरी नेतृत्व गमावल्यानंतर आज ते मंत्रालयातील पत्रकार कक्षात माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यासाठी आले होते. 

यादरम्यान त्यांनी आपण राज्यातील फळ बागायतदार शेतकरी संघटनेचे राज्य प्रमुख असून आपल्याकडील फळे इतर राज्यात कशी पाठवली जातात, यांचे अनेक किस्से ते सांगत होते. याच दरम्यान पत्रकारांनी तुमच्या कानात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय सांगितले,असा सवाल केला असता त्यांनी ...सदाभाऊचे मंत्रिपद तुला देतो.. असे सांगितले असल्याचा गौप्यस्फोट केला.

मात्र लगेचच त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला शेतकऱ्यांच्या विषयावर मुख्यमंत्री बोलले, आणि कानात इतक्‍या कमी अवधीत आपल्याला ते काय बोलणार, असा प्रतिसवाल करत सारवासारव केली. आपण केलेला शेतकरी संप हा योग्य होता, मात्र त्यानंतर झालेल्या संपातून शेतकऱ्यांचे 6 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. 

मी असे बोललोच नाही : जयाजीराव 

मी मंत्रालयातील पत्रकार कक्षात माझे मित्र सुरेश चित्ते यांना भेटायला गेलो होतो. तेथे अन्य एका पत्रकाराचा वाढदिवस सुरु होता. तिथे एकदोन जणांनी मला विचारले की, त्या पहाटे मुख्यमंत्री तुमच्या कानात नेमके काय बोलले ? त्यावर मी त्यांना हसत हसत म्हणालो, ते मला खाजगी काय बोलणार ? मुख्यमंत्री मला काय मंत्री करतो म्हणून बोलणार काय? त्यावर पत्रकारांनी विषय बदलला. मी उलट त्यांना शेतकरी संपाविषयी सविस्तर माहिती दिली. असे असताना जे मी बोललोच नाही, ते माझ्या तोंडी टाकणे चुकीचे आहे. तसेच पत्रकारितेच्या मुल्यांची ही पायमल्ली आहे. मी आधीच खूप भोगले आहे. कृपया मला टार्गेट करणे थांबवा, असे जयाजीराव सुर्यवंशी यांनी सरकारनामा कार्यालयात दूरध्वनीवर सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com